औंध
औंध: औंध वरुड रस्त्यावर असणाऱ्या नाथाच्या डोंगराचा काही भाग ते गणेश खिंड परिसर या दरम्यान असणाऱ्या मोराळे शिवारापासून सुरू होणाऱ्या डोंगरास आग लागून वनसंपदा जळून खाक झाली. रखरखत्या उन्हात लागलेल्या या आगीत वन्य प्राणी, सरपटणारे जीव, लहान मोठे किटक मृत्युमुखी पडले. या आगीत जवळपास तीस ते चाळीस एकराहून अधिकचा डोंगर जळून खाक झाला. ही आग कशाने लागली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
औंध गावच्या उत्तरेस असणाऱ्या गणेश खिंड येथून सुरू होणाऱ्या डोंगरानजीक दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. काही क्षणातच या आगीने रौद्ररूप धारण केले. बघता बघता आगीचे लोट जोतिबा डोंगरापर्यंत पोहोचले. दुपारची वेळ आणि उन्हाचा तडाखा जोरात असल्याने गवतासह वाळलेल्या वनसंपदा आग पकडून काही तासात डोंगर परिसर जळून खाक झाला. या लागलेल्या आगीबाबत वनविभागाच्या अधिका-यांना माहिती मिळताच ग्राम सुरक्षा यंत्रणेद्वारे सर्व ग्रामस्थांना आग विझवण्यासाठी येण्याचे आवाहन करण्यात आले. वनविभागाची यंत्रणा तात्काळ घटनास्थळी पोहोचली. औंध गावातील २५ ते ३० तरुण व गृह रक्षक दलातील काही कर्मचारी यांनी एकत्र येऊन झाडांच्या फांद्या तोडून त्याच्या साह्याने जोतिबा डोंगरा जवळ ही आग नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. गावातील तरुणांनी आणि वनविभागाने वेळेत प्रयत्न केल्यामुळे आग विझवण्यात यश आले अन्यथा ही आग तशीच पुढे जायगाव खिंड इथपर्यंत जाऊन वनसंपदेचे आणखी नुकसान झाले असते.
0 Comments