Ticker

6/recent/ticker-posts

ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक मनोज कुमार काळाच्या पडद्याआड



 ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. मनोज कुमार त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी लोकप्रिय होते, ज्यामुळे त्यांना 'भारत कुमार' असे नाव मिळाले होते.
मनोज कुमार यांनी पटकथा लेखक, गीतकार आणि संपादक म्हणूनही आपले कौशल्य सिद्ध केले. भारतीय चित्रपटसृष्टीतील योगदानाबद्दल भारत सरकारने त्यांना १९९२ मध्ये पद्मश्री आणि २०१५ मध्ये प्रतिष्ठित दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केले. 'पूरब और पश्चिम', 'क्रांती', 'रोटी, कपडा और मकान' हे त्यांचे प्रसिद्ध चित्रपट आहेत.


हरिकिशनचे झाले मनोज कुमार
हिंदी चित्रपटसृष्टीत असे अनेक कलाकार आहेत ज्यांनी या ग्लॅमरस जगात प्रवेश करताच त्यांची नावे बदलली. त्याचे चाहते त्यांना आजही त्याच नवीन नावाने ओळखतात. मनोज कुमार हे देखील त्यापैकी एक होते, ज्यांनी सिनेमाच्या प्रभावाखाली आपले नाव बदलले. मनोज कुमार यांचे खरे नाव हरिकिशन गिरी गोस्वामी होते. हरिकिशन गिरी गोस्वामी (मनोज कुमार) यांचा जन्म २४ जुलै १९३७ रोजी फाळणीनंतर पाकिस्तानचा भाग बनलेल्या अबोटाबाद येथे झाला. मनोज कुमारचे वडील त्या काळात भारतात सामील झाले आणि दिल्लीला आले. मनोज कुमार यांनी फाळणीचे दुःख स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची खूप आवड होती. ते अशोक कुमार, दिलीप कुमार आणि कामिनी कौशल यांचे खूप मोठे चाहते होते. त्यांना त्यांचे चित्रपट पहायला आवडायचे. त्यांच्याच चित्रपटांनी प्रभावित होऊन त्यांनी त्यांचे नाव हरिकिशन वरून मनोज कुमार  असे बदलले. 
१९५७ मध्ये अभिनय कारकिर्दीला सुरुवात
त्यांनी १९५७ मध्ये आलेल्या 'फॅशन' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. यानंतर १९६० मध्ये त्यांचा 'कच्ची की गुडिया' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात ते मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले, जो यशस्वी झाला. मनोज कुमार यांनी 'उपकार', 'पत्थर के सनम', 'रोटी कपडा और मकान', 'संन्यासी' आणि 'क्रांती' सारखे अप्रतिम चित्रपट दिले. बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांचे नाव 'भारत कुमार' असायचे.
लाल बहादूर शास्त्रींच्या सांगण्यावरून बनवला चित्रपट
मनोज कुमार  यांचे कलाकारांसोबतच राजकारण्यांशीही चांगले संबंध होते. १९६५ मध्ये भारत आणि पाकिस्तान युद्ध झाले. या युद्धानंतर मनोज कुमार तत्कालीन पंतप्रधान लाल बहादूर शास्त्रींना भेटले होते. त्यावेळी लाल बहादूर शास्त्री यांनी त्यांना युद्धावर चित्रपट बनवण्यास सांगितले. तेव्हा चित्रपट निर्मितीचा त्यांना कोणताही अनुभव नव्हता. 'जय जवान जय किसान'शी संबंधित 'उपकार' हा चित्रपट त्यांनी बनवला, जो प्रेक्षकांना खूप आवडला. मात्र लाल बहादूर शास्त्री स्वतः हा चित्रपट पाहू शकले नाहीत. ताश्कंदहून परतल्यानंतर लाल बहादूर शास्त्री हा चित्रपट पाहणार होते. पण ते शक्य झाले नाही.





Post a Comment

0 Comments