शेतकऱ्यांसह सर्वसामान्य जनतेवर अन्याय करणाऱ्या महायुती सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवारी दुपारी दीड वाजता कोरेगावात महाविकास आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयावर शेतकरी मोर्चा काढण्यात आला.आमदार शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करत महायुती सरकारचा निषेध करण्यात आला.
शहरातील जुना मोटार स्टॅन्ड येथून मोर्चाला सुरुवात झाली. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार, जिल्हा सरचिटणीस मनोहर बर्गे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे माजी उपजिल्हाप्रमुख दिनेशआप्पा बर्गे, तालुकाप्रमुख सचिन झांजुर्णे, बाजार समितीचे माजी सभापती एडवोकेट पीसी भोसले, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अर्चना केंजळे देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, युवक तालुकाध्यक्ष राहुल साबळे, किशोर नानासाहेब बर्गे, नगरसेवक, आजी माजी पदाधिकारी या मोर्चात सहभागी झाले होते.
महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीत यश मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची दिशाभूल करत कर्जमाफी करण्याची ग्वाही दिली होती, शेतकऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची मते मिळवत निवडणुकीत अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळाल्यानंतर सरकारला शेतकऱ्यांचा विसर पडला आहे. कर्जमाफी विषयावर सरकारमधील मंत्री वेगवेगळी भूमिका जाहीर करत आहेत. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे देखील राज्याची आर्थिक परिस्थिती सध्या चांगली नसल्याने शेतकरी कर्जमाफी करू शकत नाही, असे स्पष्ट सांगत आहेत एकूणच या सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. या सरकारला सत्तेवर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले
कोरेगाव विधानसभा मतदारसंघात शेतकऱ्यांना नवीन वीज कनेक्शन मिळत नाही. महावितरण कंपनीचे अभियंते सौरऊर्जा कनेक्शन घेण्यासाठी दबाव आणत आहेत. धोम डाव्या कालव्याचे पाणी कोरेगाव तालुक्यासाठी वरदान असताना देखील केवळ राजकारणापायी हे पाणी अन्य ठिकाणी वळवले जात आहे. सध्या तालुक्यात तीव्र पाणीटंचाई जाणवत असून नियमानुसार धोम धरणातून पाण्याचे रोटेशन द्यावे, या मागणीसह कोरेगाव तालुक्यात गायरान जमिनीवर उभारण्यात येणारे बेकायदेशीर सौर ऊर्जा प्रकल्प तात्काळ रोखा अशी मागणी आमदार शिंदे यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. प्रांताधिकारी अभिजीत नाईक यांना मोर्चाच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. शेतकऱ्यांच्या भावना सरकारपर्यंत पोहोचवाव्यात आणि तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0 Comments