रुग्णसेवा की मनमानी? सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे आक्रमक
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा: शहरातील ‘साई अमृत हॉस्पिटल’ च्या कारभाराबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करणारी धक्कादायक घटना समोर आली असून, रुग्णसेवेऐवजी नागरिकांना त्रास दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकारामुळे शहरातील खासगी रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एका ज्येष्ठ महिलेच्या निधनानंतर त्यांच्या नातेवाईकांना मृतदेह ताब्यात घेण्यासाठी दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागली. आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वारंवार वेगवेगळ्या सूचना देण्यात आल्याने कुटुंबीयांना मानसिक त्रास सहन करावा लागल्याचे सांगण्यात आले. काही तास उलटूनही प्रक्रिया पूर्ण न झाल्याने संताप व्यक्त करण्यात आला.
घटनेदरम्यान रुग्णालय परिसरात पार्किंगची कोणतीही व्यवस्थित सुविधा नसल्याचे निदर्शनास आले. नातेवाईकांसाठी बसण्याची अपुरी व्यवस्था, उन्हात थांबावे लागणे तसेच कर्मचारी वर्गाकडून समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याच्या तक्रारी पुढे आल्या आहेत.
दरम्यान, संबंधितांनी आक्षेप नोंदवल्यानंतर काही मिनिटांतच प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचे सांगण्यात आले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना वेगळी वागणूक दिली जाते का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते रमेश उबाळे यांनी रुग्णालयाच्या मान्यता, बांधकाम नियम, अग्निसुरक्षा, पार्किंग व्यवस्था तसेच शुल्क पद्धती यांची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. शहरातील सर्व खासगी रुग्णालयांची फेरतपासणी करून नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित सेवांमध्ये पारदर्शकता आणि संवेदनशीलता अपेक्षित असताना अशा तक्रारी समोर येणे ही गंभीर बाब मानली जात आहे. संबंधित प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

0 Comments