केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावला पंढरीचा विठूराया!
श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाखांची मदत जाहीर; अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांची घोषणा
सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
कराड : केरळ येथे आलेल्या महाप्रलयामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले असून, लाखो लोक विस्थापित झाले आहेत. या पूरग्रस्त बांधवांच्या मदतीसाठी साक्षात पंढरपूरचा विठुराया सरसावला आहे. केरळ पूरग्रस्तांसाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीकडून 25 लाख रूपयांचा मदतनिधी देणार असल्याची घोषणा समितीचे अध्यक्ष नामदार डॉ. अतुल भोसले यांनी केली.
निसगसंपन्नतेने नटलेल्या केरळला तीव्र पुराचा फटका बसल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. या पुरामुळे मोठ्या प्रमाणावर जीवीतहानी झाली असून, सुमारे 46 हजार हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाले आहे. तसेच 10 लाखाहून अधिक लोक विस्थापित झाले आहेत. शिवाय 1700 कोटी रूपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. केरळ राज्यावर कोसळलेले हे संकट दूर करण्यासाठी या राज्यातील पूरग्रस्त बांधवांना देशराभरातूनच नव्हे तर परदेशातूनही मोठ्या प्रमाणावर मदतीचा ओघ सुरू असून, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य सरकारच्या माध्यमातून केरळसाठी भरीव निधी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीने केरळ पूरग्रस्तांसाठी 25 लाख रूपयांचा मदतनिधी देण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 2 दिवसांत त्याबाबतच्या वैधानिक गोष्टींची पूर्तता करून हा निधी केरळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीकडे सूपुर्द करणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष नामदार डॉ.अतुल भोसले यांनी दिली.
No comments:
Post a Comment