वितरणचे कर्मचारी, अधिकारी मुजोर
सत्य सह्याद्री न्युज नेटवर्क
पाटण : थकीत वीज बिलासंदर्भात ठोस निर्णय झाल्याशिवाय कोणत्याही वीज ग्राहकाचे कनेक्शन तोडू नका, असा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा स्पष्ट आदेश असताना देखील उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता लावत पाटणमध्ये वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडण्याची मोहीम सुरू केली होती. ग्राहकांना अर्ध्या तासात वीज बिल भरा नाही तर कारवाईला सामोरे जा, अशी दमदाटी करून थकीत ग्राहकांचे कनेक्शन तोडले जात होते. वीज वितरण कंपनीच्या अरेरावीला चाप लावत विक्रमबाबा पाटणकर यांनी अधिकारी, कर्मचारी यांना सुनावत शासनाचा ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत कोणाचेही वीज कनेक्शन तोडू नका. अन्यथा लोकांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला.
कर्मचाऱ्यांकडून उर्मट उत्तर.
मी पत्रकार आहे. वीज बिलाबाबत निर्णय होत नाही तोपर्यंत कनेक्शन तोडू नका असा आदेश उपमुख्यमंत्री यांचा असल्याचे एका पत्रकाराने वीज वितरणाच्या कर्मचाऱ्यांना सांगितले. मला काही माहीत नाही, पत्रकार असा अथवा कोणीही असा. आम्हाला वरिष्ठांनी कनेक्शन तोडण्यास सांगितले असल्याचे उर्मट उत्तर कर्मचाऱ्यांकडून देण्यात आले.
कारवाई होणार का?
पाटण वीज वितरणचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तोंडाला मास्कही लावला नव्हता. पाटणच्या मुख्य बाजारपेठेत प्रत्येक दुकानात, घरात विना मास्क जावून ग्राहकांना ते खडे बोल सुनावत होते. त्यांच्यावर मास्क न घातल्याने कारवाई होणार का? असा सवाल ग्रामस्थ करत आहेत.

0 Comments