Ticker

6/recent/ticker-posts

वळसेत ४५ते ५० एकर ऊस जळुन खाक

शेंद्रे  : परिसरातील वळसे ता.सातारा येथे शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत वळसे गावातील जवळपास ३० शेतकऱ्यांचा मिळून ४५ ते ५० एकर ऊस जळून खाक झाला असल्याची घटना समोर आली आहे. याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार आज दुपारी ठीक १ वा. सुमारास वळसे येथील शेतातील नारगौंडी भागातील विहिरीजवळ शॉर्टसर्किटने लागलेल्या भीषण आगीत जवळपास ३० शेतकऱ्यांचा ४५ ते ५० एकर ऊसाचे क्षेत्र जागेवरच जळून खाक झाले असल्याची भीषण घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन बंब त्वरित घटनास्थळी दाखल झाले परंतु वाऱ्यामुळे आगीची तीव्रता खुप जोराची असल्यामुळे आणि अग्निशमन बंबास शेतामध्ये येण्यास व्यवस्थित रस्ता नसल्यामुळे आग विझवण्यासाठी काही ठोस उपाययोजना करता आली नसल्याने बळीराजाचे फार मोठे नुकसान झाले आहे. गेल्या महिन्यातच भरतगाव ता. सातारा येथेही काही शेतकऱ्यांचा जवळपास १५ एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले होते, ही घटना ताजी असतानाच या महिन्यात आज पुन्हा अशीच भीषण घटना घडली आहे. आज झालेल्या या भीषण घटनेमध्ये वळसे येथील ३० शेतकऱ्यांचे सर्व मिळून ४५ एकर उसाचे क्षेत्र जळून खाक झाले असून जवळपास ७० ते ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. महावितरणच्या शॉर्टसर्किटमुळे ही भीषण आग लागल्याचे स्पष्ट झाले असल्यामुळे सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त नुकसानभरपाई मिळावी अशी मागणी आहे.  तसेच सदर घडलेल्या या भीषण आगीत जळालेल्या उसाची कारखान्याकडून कोणत्याही स्वरूपात कपात होऊ नये अशी सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची अजिंक्यतारा सह. साखर कारखान्याकडे आर्जवी मागणी आहे.

Post a Comment

0 Comments