सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
सातारा : सातारा जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती शिवाजीराव सर्वगोड यांच्यावर येळीव ता.खटाव येथे खंडणीसाठी तलवार हल्ला करून धमकी दिल्याप्रकरणी येळीव येथील एका युवकावर औंध पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून दस्तुरखुद्द समाजकल्याण सभापतींनाच खंडणी मागितल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
याबाबत औंध पोलीस स्टेशनमधून मिळालेली अधिक माहिती अशी, शुक्रवारी सकाळी नऊ वाजणेचे सुमारास शिवाजी सर्वगोड हे येळीव येथील त्यांच्या शेतातील लव्ही नावचे शेतातील घरात एकटेच होते. यावेळी गावातील अमोल विष्णू घाडगे हा हातात तलवार घेऊन त्याठिकाणी आला व सभापतींना म्हणू लागला की,तू सभापती झालास म्हणजे काय झाले असे ओरडून सभापतींकडे पन्नास हजार रूपये मागितले. त्यावेळी सभापतींनी त्यास पैशाची अडचण असल्याचे सांगितले. त्यानंतर घरात घुसून आपल्या खिशातील सात हजार रुपये
अमोल घाडगे याने चोरून नेल्याचे शिवाजी सर्वगोड यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
त्यानंतर वस्तीवरून जात असताना वस्तीवरील प्रमोद जगताप याने अमोल यास विचारले की तू तलवार घेऊन का आला आहेस त्यावेळेस तो म्हणाला की मी हप्ता गोळा करायला आलो आहे. त्यानंतर काही वेळाने शिवाजी सर्वगोड टाकीवर अंघोळ करण्यासाठी टाकीवर गेले असता पाच मिनीटानंतर अमोल परत त्याठिकाणी दुचाकी गाडीवरून आला व त्यांना म्हणाला की मी आज तलवार घेऊन आलो आहे दोन दिवसांनी घोडा घेऊन येणार आहे तू व तुझ्या घरातील सर्वांना संपवून टाकणार आहे तू प्रत्येक महिन्यास दहा हजार रुपये दिले नाही तर मी तुला संपवून टाकीन असा दम देऊन तेथून निघून गेला.याबाबतची फिर्याद शिवाजी सर्वगोड यांनी औंध पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे. सदर घटनेची नोंद औंध पोलीस स्टेशनमध्ये झाली असून घटनास्थळी सपोनि सुनील जाधव यांनी भेट देऊन पाहणी केली आहे. याप्रकरणी अमोल घाडगे यास अटक केली आहे. दरम्यान सदर घटनेमुळे खटाव तालुक्यासह.जिल्हयाच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
No comments:
Post a Comment