सत्य सह्याद्री न्यूज नेटवर्क
....................................................
सातारा : दोन महिन्यांपूर्वी भाजपला नावं ठेवणारे माणचे आमदार स्वत:वरील गुन्ह्यातून वाचावं म्हणून सध्या धडपड करत आहेत, अशी टीका करतानाच माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी भाजपचे नूतन खासदार मित्रप्रेम म्हणून बदनाम, किंमत नसणार्यांना घेऊन फिरत आहेत. खासदारांनी आता हे बदलेलं वागणं थांबवायला हवं, असा सल्लाही रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना दिला.
येथील विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपचे माण आणि खटाव तालुकाध्यक्ष व इतर पदाधिकारी उपस्थित होते. माजी आमदार डॉ. येळगावकर म्हणाले, माढा लोकसभा मतदारसंघात तिसरी आघाडी झाली होती. त्यातून संजय शिंदे यांनी काढता पाय घेतल्याने आघाडीला भवितव्य नसल्याचे दिसून आले. त्यामुळे माणच्या आमदारांनी पळवाट शोधली.
त्यांच्यावर खंडणी तसेच इतर अनेक गुन्हे नोंद आहेत. त्यातून वाचण्यासाठी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला. पण, आमदारांची खटाव तालुक्यातील संघटना पूर्णपणे विस्कळीत झालीय. त्यांनी केलेले माण आणि खटावचे काँग्रेसचे अध्यक्षही त्यांच्याकडे राहिले नाहीत. राजकारणातील त्यांचा हा शेवटचा खटाटोप आहे.
खर्या अर्थाने रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना आणण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्रयत्न केले. माजी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील, आमदार प्रशांत परिचारक यांचेही योगदान आहे. पण, आमदार गोरे म्हणतात मीच सर्व केलं.
माण विधानसभा मतदारसंघात खटाव तालुक्यातील जिल्हा परिषदेचे तीन गट व एक नगरपंचायत असतानाही खटावने 10 हजार 441 चं रणजितसिंह नाईक-निंबाळकरांना मताधिक्य दिले. तर माणमध्ये संपूर्ण तालुका असताना व आमदारांसह शेखर गोरे असूनही भाजपला केवळ 12 हजार 774 चं मताधिक्य मिळालं.
आंधळी, बिदाल जिल्हा परिषद गटातही राष्ट्रवादी भाजप उमेदवाराच्या थोडी मागे आहे. म्हसवड पालिका शेखर गोरे यांच्याकडे, दहिवडी नगरपंचायत आमदारांकडे मग मते कोठे गेली ? असा सवालही डॉ. येळगावकर यांनी केला.
No comments:
Post a Comment